Sunday, May 31, 2015

शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे?

शासनकर्ती जमात बणण्यासाठी काय करायला पाहिजे?

आपल्या समाजात आता मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, सरकारी-निमसरकारी, प्रशासकीय उच्चपदस्थ सेवेत असेलेले अथवा निवृत झालेले अनेक बुध्दिवंत व विचारवंत निर्माण झाले आहेत. हे लोक आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहेत. 'समाजाला आणीबाणीच्या काळात दिशा देण्याचे काम करतो तो बुध्दिजिवी' अशी व्याख्या डॉ. बाबासाहेबांनी 'ऍन निहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात केली आहे. सध्या आणीबाणीची वेळ निश्चित आली आहे. आता समाजामध्ये हजारो वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स झाले असल्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे समाज प्रगल्भ झालेला आहे. 
डॉ. बाबासाहेब राजकारणाचे महत्व आणि निकड समजावून सांगतांना म्हणतात, "आपल्या प्रगतीसाठी जिच्यावर आपण अवलंबून राहू शकू अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे राजकीय शक्ती हस्तगत करणे. आपल्या मुक्तीचा तो एकच मार्ग आहे. याबद्दल तर मला मुळीच संदेह नाही व या शक्तीशिवाय आमचा सर्वनाश होईल." (अ.भा.दलित वर्ग परिषद नागपूर १८,१९ जुलै १९४२) 
अस्पृष्य समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल, तर तुम्हाला राजकारण काबीज करावयास पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणतेच साधन नाही. म्हणूनच आपला नाश व अवनती झाली आहे. आपणास उठण्याचीही ताकद राहिलेली नाही. आपली समाज संख्याही पण अल्प आहे व तिही विस्कटलेली आहे. ही सर्व परिस्थिती सुधारुन घेण्यासाठीच आपल्या हाती राजकीय सत्ता पाहिजे. (पुणे ०४.१०.१९४५चे भाषण, भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १३१) तुकड्यासाठी दुसर्या्च्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये, पोटापाण्याचा प्रश्नड सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठीच राजकीय सत्तेची जरुरी असते आणि ती मिळविण्यासाठीच आम्ही झगडत आहोत. (भाषण खंड १ संपादक- गांजरे पृष्ठ्य १५३) 
शासनकर्ती जमातीवर अन्याय, अत्याचार होत नाहीत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर गोळीबार हत्याकांड किंवा खैरलांजीसारखे प्रकरणे मराठा अथवा ब्राम्हणांच्या घरी होत नाहीत. कारण ते शासनकर्ती जमाती आहेत. म्हणूनच आतातरी आपले डोळे ऊघडणे आवश्यक झाले आहे. 
शासनकर्ती जमात बणण्याचे ध्येय गाठण्यासाठी आर.पी.आय पक्षाचे सर्व गट, बहन मायावतीचा बहुजन समाज पक्ष, आदिवासी-ओ.बी.सी.चे पक्ष असे समान व फुले, शाहु, आंबेडकरी विचाराचे सर्व पक्षांनी-गटांनी एकत्रीत येऊन येणारी विधानसभा लडविणे आवश्यक आहे. परंतु यासाठी या पक्षांचे, गटाचे नेता वर्ग तयार होतील असे वाटत नाही. कारण ऐक्याचे वारे मध्ये-मध्ये वाहायला लागले की, नंतर ते कधी विरुन जातात तेही कळत नाही. म्हणजे हे ऐक्य कालापव्यय करणारे व मृगजळासारखे ठरतात. म्हणून आता समाजाने एकत्र येऊन या नेत्यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. 
याबाबत जर सर्व बाबतीत व्यवहार्य असेल तर खालीलप्रमाणे उपाययोजना करुन पाहायला काही हरकत नाही. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबर २००९ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका जाहिर होणार आहे. त्यापुर्वीच आपण विचारविनिमय करुन काहीतरी ठोस असा निर्णय घेऊन तशी कार्यवाही होणे गरजेचे झाले आहे. 
प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अशा तीन स्तरावर (शहराच्या ठिकाणी वार्ड स्तरावर) कोणत्याही गट अथवा पक्षाचा सभासद नसलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंची निवड समिती तयार करावी. 
निरनिराळ्या आणि फुले, शाहु, आंबेडकरी पक्षांचे सभासद असलेल्या व निवडणूकीला उभे राहू इच्छिणार्याी कार्यकर्त्यांची, उमेदवारांची पंचायत समिती स्तरावरावरील निवड समितीने छानणी करुन अशी यादी जिल्हा परिषद निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी सुध्दा त्या यादीची छानणी करुन ती विधानसभा निवड समितीकडे पाठवावी. त्यांनी त्या यादीची यादीची छानणी करुन दोन नांवे निवडावीत. त्यापैकी एक उमेदवार प्रमुख व दुसरे नांव डमी राहील म्हणजे प्रमुख उमेदवाराच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यास त्याच्या ऎवजी डमी उमेदवाराला उभे राहता येईल. ही दोन्ही नांवे ज्या गटाचे, पक्षाचे असेल त्या गटाच्या प्रमुखाकडे पाठवावीत. त्यानंतरची तिकीट देण्याची व निवडणुकीची पुढील कार्यवाही त्या गटाने, पक्षाने करावी. अशा निवड केलेल्या उमेदवाराला आपसातील हेवेदावे विसरुन सर्वांनी मान्यता द्यावी व त्याच्या विरोधात कुणीही आपल्या गटाचा/पक्षाचा उमेदवार उभा ठेवू नये. त्यामुळे सर्वमान्य उमेदवार मिळेल व मतविभागणी टळेल. अशा उमेदवाराला बहुजन समाजातील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्गिय जाती व अल्पसंख्याक धार्मिक समाज सुध्दा समर्थन देऊ शकतील. समाजातील सर्व मतदारांनी मतदान करण्याकडे व कोणाचेही मत वाया जाऊ नये, याकडे जागृत लोकांनी लक्ष ठेवावे. 
आपल्या समाजातील नोकरीदार वर्ग जसे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, विद्युत मंडळाचा तांत्रिक कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शेती विभागाचा कर्मचारी असे अनेक विभागाचे कर्मचारी खेड्यापाड्यापर्यंत काम करीत आहेत. अशा लोकाना खेड्यापाड्यात मान असतो. म्हणून त्यांनी जमेल त्या मार्गाने सक्रियपणे पण गुप्त पध्दतीने प्रचार व प्रसार करावा. कारण खेड्यापाड्यात गठ्ठा मतदान असते. असे जर वातावरण आपण निर्माण करु शकलो तर समाजामध्ये नविन उत्साह निश्चितच संचारेल आणि समाज एकजूट व्हायला वेळ लागणार नाही. 
समाजातील सर्वांनी तन, मन, धनाने शक्ती निर्माण करुन संपुर्ण ताकद या उमेदवाराच्या मागे लावावी व अशा प्रकारे 'बहुजन शासनकर्ती जमात अभियान' राबवावे.
सदर योजनेवर विचारवंतांनी विचारविनिमय करावा. जर सदर योजना व्यवहार्य वाटत असेल तर कार्यवाही करण्याकरिता पाऊल उचलावे. जर सदर योजना व्यवहार्य वाटत नसेल किंवा त्यात काही तृटी असतील तर त्या दूर करावेत अथवा ज्यांच्याकडे त्याऎवजी दुसरी पर्यावी योजना असेल तर तसे त्यांनी मांडावेत. 
शेवटी डॉ. बाबासाहेबांचे २० जुलै १९४२ चे अखिल भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथील प्रेरणादायी भाषण सर्वांनी लक्षात ठेवावे. त्यांनी म्हटले होते की, "तुम्हाला माझ्या संदेशाचे अंतीम शब्द हेच आहे की, शिका, संघर्ष करा आणि संघटीत रहा. स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि कधिही निराश होऊ नका." म्हणजे डॉ. बाबासाहेबांची शासनकर्ती जमात बणण्याची संकल्पना वास्त्वात उतरविण्यास कठीण जाणार नाही. 
आर. के. जुमळे, अकोला 
www.rkjumle.wordpress.com

मी आणि माझं लेखण..

No comments:

Post a Comment